देविदास गोरे
रुईछत्तिशी(अहमदनगर) : नगर तालुक्यातील सोलापूर रस्त्यावरील गावांची गेल्या वर्षीपासून पिण्याच्या पाण्यासाठी वाताहत सुरू आहे. या परिसरातील नागरिकांना पण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या सोलापूर-नगर महामार्गाचे काम सुरू असून, यामुळे बुर्हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.
वाळुंज, पारगाव, शिराढोन, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तिशी, मठपिंप्री आदी गावांची पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नगर तालुक्यात बुर्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतून 44 गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या वर्षीपासून वीजबिल, सातत्याने फुटणारी पाइपलाइन आदी समस्यांमुळे नगर- सोलापूर रस्त्यावरील गावांना सध्या पिण्यासाठी पाणी नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने विकतचे पाणी घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. बुर्हाणनगर पाणी योजनेसाठी राज्य, केंद्र सरकारने सुधारित निधी मंजूर केला; परंतु त्यांची कार्यवाही कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत पाणी प्रश्न सोडवण्याचा सरकारने निर्णय घेतला. परंतु, त्यांची अमलबजाणी होताना दिसत नाही. गेल्या वर्षीपासून नगर-सोलापूर महामार्गाचे काम चालू असल्याने पाईपलाईन सातत्याने फुटते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्याची पाहणी करण्यासाठीही लोकप्रतिनिधींना वेळ नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी वारंवार या योजनेची पाहणी केली. त्यांनाही या गावांचा पाणी प्रश्न हाताळता आला नाही.
पारगाव (ता.नगर) येथे पाईपलाईन फुटली असून, लाखो लिटर पाणी वाया गेले. ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण सत्ताधारी आमदारांनी विचारात घ्यावी. पाणी योजना त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 192 कोटी राज्य सरकारने बुर्हाणनगर पाणी योजनेसाठी मंजूर केले आहेत, त्याची लवकर कार्यवाही व्हावी अन्यथा ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागेल.