संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यावरुन- नाशिकला जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात नाशिक येथील रहिवासी असणार्या राजश्री विजय पाटील या महिलेचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, विजय नारायण पाटील, राजश्री विजय पाटील, चिन्मयी विजय पाटील, वनिता राजेश कुलकर्णी, आदिती राजेश कुलकर्णी (नाशिक) हे आपल्या वॅगनआर कारमधून पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली.
झालेल्या भीषण अपघातात, कारमधील राजश्री विजय पाटील (वय 46) यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पो. नि. अरुण आव्हाड, सहा. फौजदार एस. एस. पाटोळे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातातील जखमींना संगमनेर येथील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.