सोनई : पुढारी वृत्तसेवा : आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून घोडेगाव व परिसरातील अनेक दिवसांचा पिण्याचा पाणीप्रश्न आता मार्गी लागणार आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 48.83 कोटी रुपयांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, नुकतीच आमदार गडाख यांनी कामाची पाहणी करताना हे काम एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करा,अशा सूचना केल्या आहेत. नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाहणी दौर्या दरम्यान आमदार शंकरराव गडाख यांनी ग्रामस्थ व ठेकेदार यांची एकत्रित बैठक घेऊन गावातील पाण्यासंबंधीच्या प्रत्येक समस्येचा जागेवरच तोडगा काढला.
लवकरात लवकर या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन एका वर्षातच घोडेगावकरांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळणार आहे. पाणी योजनेचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याच्या सूचना आमदार गडाख यांनी ठेकेदार यांना दिल्या आहेत. तसेच पाणी टँकमधील पाणी स्वच्छ रहावे, म्हणून टँकच्या आजूबाजूला वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही आमदार गडाख यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या. तसेच ग्रामस्थ आणि ठेकेदार यांच्यामध्ये कामाविषयी जो संभ्रम होता, तो जागेवरच दूर करून प्रत्यक्षात या कामाला सुरुवातही झाली आहे.
तब्बल एक वर्षांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेवासा तालुक्यातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डर आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे घोडेगाव येथे येऊन सुपुर्द केल्या होत्या. यात घोडेगाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डरचाही समावेश होता.
250 कोटींच्या पाणी योजनेसाठी गडाख यांचा पाठपुरावा
नेवासा तालुक्यात मागील वर्षी 250 कोटींच्या पाणी योजना गडाख यांनी मंजूर करून आणल्या होत्या त्यापैकी अनेक योजनेचे काम चालू झाले आहे .पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घोडेगाव येथे समक्ष येवून आमदार गडाख यांच्याकडे 49 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे मंजुरी पत्र दिले होते. कामे दर्जेदार करा अशा सूचना आमदार गडाख यांनी ठेकेदारांना दिल्या.
अशी असेल नवीन पाणी योजना..!
योजनेमध्ये झिने वस्ती, मोहिते वस्ती, कदम वस्ती (सोनई रोड), चेमटे वस्ती, कदम वस्ती (चांदा रोड) इ. वस्त्यांचा समावेश आहे. गावात 5 लाख 15 हजार लिटरची मुख्य टाकी असून या सर्व वस्त्यांवर नविन टाक्या बांधण्यात येणार आहे व त्यामध्ये मुख्य टाकीतून पाणी येणार आहे तसेच पाण्याचा शास्वत उदभव मुळा कॅनॉल आहे.कॉलनीत 8.7 कोटी लिटर पाण्याचा साठवण तलाव बांधला जाणार असून किमान दीड महिना पाणी पुरेल, असे नियोजन आहे.याच ठिकाणी 30 लाख लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.गावांतर्गत 47 कि.मी. ची वितरण व्यवस्थाही करणेत येणार आहे. गावठाणमध्ये जुनीच 1 लाख लिटर क्षमतेची टाकी वापरली जाणार आहे.
दैनंदिन माणसी 55 लिटर पाणी दिले जाणार
नळ पाणीपुरवठा योजना अनेक गावांना लाभदायी ठरणार आहे. योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे दैनंदिन माणसी 55 लिटर पाणी दिले जाणार आहे. योजना सन 2053 सालापर्यंत गृहीत धरून केली आहे. या गावची वाड्या-वस्त्यासह सध्याची लोकसंख्या 13,261 आहे.