जामखेड: पुढारी वृत्तसेवा : जामखेड नगर परिषद हद्दीतील जांबवाडी येथे रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरीत चारचाकी वाहनासह ४ जणांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) सायंकाळी ४.३० वाजता घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड शहराजवळ असलेले जांबवाडी येथे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. वाहनातील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वाहनात रामहरी गंगाधर शेळके (वय ४०), किशोर मोहन पवार (वय २५), अशोक विठ्ठल शेळके (वय ३५, सर्व रा. जांबवाडी, ता जामखेड), चक्रपाणी सुनिल बारस्कर (रा. जामखेड) आदींचा समावेश होता.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील मृतदेह नागरिक व तरुणांनी रस्सीच्या सहायाने वर काढले. यावेळी ग्रामीण रूग्णालयात सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.