भेंडा : पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षाच्या पिकांची अवर्षण नुकसानभरपाई विमा कंपनीने नाकारली होती, म्हणून जीवन ज्योत फाउंडेशनने तालुका ते दिल्ली पातळीवर पाठपुरावा करत अवर्षण कालावधी दाखवून दिल्यानेच आता लाभार्थीना ही रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व आनंदी होणार आहे.
नेवासे तालुक्यातील नुकसानग्रस्त मंडलातील शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर होऊनही कंपनी व कृषी, तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीकविमा मिळाला नाही.
तसेच त्यानंतरही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, त्यांनाच विमा रक्कम मिळणार असा सूर निघू लागला होता. परंतु मोबाईलला रेंज नाही व शेतावर २४ तास वीज नसल्याने सर्व शेतकरी ऑनलाइन तक्रारी देऊ शकत नाही व त्यामुळे लाभापासून वंचित राहतात ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यामुळे १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२३ हा कालखंड अवर्षण काल आहे व तो २१ दिवसांपेक्षा जास्त असल्याचे सरकारच्या लक्षात आणून दिले. आणि पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत असलेल्या नियमावलीत २१ दिवसांपेक्षा जास्त कालखंड अवर्षण असल्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शासकीय उंबरठा उत्पन्न ग्राह्य धरून सरसकट विमा रक्कम द्यावी यासाठी फाउंडेशनचे कमलेश नवले व सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला. फाउंडेशनच्या या कामामुळे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.