अहमदनगर

नगर : ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी 50 हजार भरपाई द्या : जिल्हा राष्ट्रवादीची मागणी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप पाऊस सुरुच असल्याने शेतकर्‍यांंना खरीप पिकांचे उत्पन्न मिळणे अवघड आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी एकरी 50 हजार रुपयांची मदत द्या अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नगर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शारदा लगड, संजय कोळगे, वसंत कांबळे, काकासाहेब तापकीर, किसनराव लोटके, प्रा.सिताराम काकडे उपस्थित होते.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सरासरी पेक्षाही जास्त पाऊस सुरु आहे. त्यामुळे तूर, कपाशी, मुग, तूर, सोयाबीन, यासह ऊस व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळी सवलतीमुळे शेतकर्‍यांना थोडाफार दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT