संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यामध्ये बालविवाह होऊ नये, यासाठी प्रशासनाने जनजागृती करीत गावोगावी महिला व मुलींच प्रबोधन करावे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी केले.
संगमनेर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर उपमुख्याधि कारी सुनील गोर्डे, नायब तहसीलदार राजेश पौळ, संगमनेर शहर पो. नि. भगवान मथुरे, संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पो. नि. सुजित ठाकरे, सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप वायाळ व सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
रुपवते म्हणाल्या की, सध्या सर्वत्र बालविवाहाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत चालले आहे. त्यामुळे त्या बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने नुसती कागदपत्रे न रंगविता प्रत्यक्ष अंगणवाडी सेविका आशा सेविका तलाठी यांच्या मार्फत बालविवाह करणार्या मुला मुलींच्या आई-वडिलांमध्ये जनजागृती करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
महिलांवरील अन्याय अत्याचार कमी व्हावे, या करिता शासन कटिबद्ध आहे .परंतु गाव पातळीवर बालविवाह आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन जाहीर करण्यात आली आहे. याचाही महिलांनी लाभ घ्यावा, असे आवा हन त्यांनी केले. या बैठकीला संगमनेर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अंगण वाडी सेविका यांची उपस्थिती होती.