अहमदनगर

संगमनेरमध्ये होणार 1 रुपयात विवाह! ‘मालपाणी’चे आयोजन; सर्वधर्मीय 25 जोडप्यांचा समावेश

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: मालपाणी उद्योग समुहाच्या वतीने अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवार (दि. 22 एप्रिल) रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात 25 हिंदुंसह मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध असे सर्व धर्मीय वधू-वर जोडपी अवघ्या 1 रुपयामध्ये विवाहबद्ध होणार आहेत. मालपाणी उद्योग समुहाचे अध्वर्यू स्व. ओंकारनाथ व स्व. माधवलाल मालपाणी यांनी 1997 साली अवघ्या 1 रुपयात नाममात्र शुल्क घेऊन सामुदायिक विवाह चळवळ सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे.

अक्षय तृतीयेला होणार्‍या सामुदायिक विवाह सोहळ्यास 25 कार्य समित्या काम करीत आहेत. विवाहस्थळी सुसज्ज शाही मांडव, वधू-वरांची स्वतंत्र निवास व्यवस्था, दोन्ही बाजूंच्या पाहुण्यांसह निमंत्रितांच्या भोजनाची व्यवस्था, शाही सवाद्य वरांची मिरवणूक, विवाह बद्ध होणार्‍या नव दाम्प्त्यांना पोषाख, मुंडावळ्या, अक्षता, पुरोहित वृन्दाकडून मंत्रोच्चारात होणारी सप्तपदी व मंगलाष्टके तर बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांच्या परंपरेनुसार त्या-त्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत विवाह साजरे होणार आहेत.

प्रत्येक दाम्प्त्याला मालपाणी उद्योग समूहाच्या च्यावतीने स्टील कपाट, भांडी, भांड्यांची मांडणी असे संसारोयोगी सुमारे 25 हजारांचे साहित्य भेट देण्यात येणार आहे. दरम्यान, संगमनेरकरांनी या शाही सोहळ्यास उपस्थित राहून नव दाम्प्त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत, असे आवाहन मालपाणी उद्योग समुहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशीष मालपाणी परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT