कर्जत, पुढारी वृत्तसेवा: कर्जत शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपसरपंच दादासाहेब सोनमाळी यांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत शहर व उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे महिलांना हातपंपांवरून पाणी आणावे लागते. पाण्यासाठी महिलांचे चांगलेच हाल होत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नगरपंचायतीने शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत सुरू करावा. कर्जत शहरातील नागरिकांना सध्या एक हजार रुपयांच्या चढ्या भावाने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. हा नाहक भुर्दंड नागरिकांना बसत आहे. त्यामुळे नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करू, असा इशारा दादासाहेब सोनमाळी यांनी निवेदनात दिला आहे.