राहुरी; पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील विविध विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आ. तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याकडे आदिवासी विकास खात्याच्या माध्यमातुन मतदार संघात हजारो आदिवासी कुटुंबांचे जातीचे दाखले, नविन शिधापत्रिका तसेच खावटी योजना, किराणा किट अशा अनेक योजना राबविल्या.
यावेळी आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका व जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती भास्करराव काळनर होते. या भागात आदिवासी कुटुंबांची संख्या जास्त आहे. येथील आदिवासी बांधवांना पुढील पिढीतील मुलांना शिक्षण घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची अत्यंत गरज होती. या महत्वाच्या दाखल्यांमुळे त्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या भागात सरकारमध्ये असताना अनेक योजना राबिवल्या. वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची अवस्था दयनीय होती. हे रस्ते आदिवासी विकास व ग्रामविकास विभागातुन तयार केले. शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा पुर्ण दाबाने होत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत असे. याकरीता उर्जा खात्याच्या माध्यमातुन 5-6 नवीन ट्रान्सफार्मर बसवुन या भागातील विजेचा प्रश्न कायमचा निकाली काढल्याचे मला समाधान आहे, असे आ. तनपुरे म्हणाले.
यावेळी विविध रस्त्यांचे लोकार्पण व मुस्लीम समाजाचे स्मशानभूमीचे विकास कामे, हिंदु स्मशानभूमी विकास कामे, 90 आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप व 67 कुटुंबांना शिधा पत्रिकेचे वाटप आ. तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेरी चिखलठाण व परीसराच्या वतीने आ. तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच डॉ.सुभाष काकडे, उपसरपंच आबासाहेब काळनर ,भास्कर काळनर,सखाहरी काकडे, महमंद शेख, इसाकभाई सय्यद, विनोद काळनर ,विजय बाचकर, चांगदेव काकडे, गंगाधर काकडे, बाजीराव बाचकर ,रघुनाथ काकडे, साहेबराव काकडे, विजय डोमाळे, ज्ञानेश्वर बाचकर ,अशोक करडे, चंदु कदम,बापु जगताप ,पप्पु माळवदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन करुन आभार गंगाधर काकडे यांनी मानले.
पैसे जमाच नाही!
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या पिकांचे शेतीसाठी त्वरित मदत देऊ, असे म्हणणारे शिंदे- फडणवीस सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली. दीपावली संपली तरी एक छदामही जमा झालेला नाही, याबाबत यावेळी चर्चा झडत होती.