अहमदनगर

भाजपकडून लक्ष विचलित केले जातेय : आ. थोरात ; संगमनेरात काँग्रेसच्या बैठकीमध्ये चौफेर टीकास्त्र

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य जनतेला भूलथापा मारून सत्तेत आलेले भाजपप्रणित सरकार धर्माच्या नावावर राजकारण करीत आहे. ते विकासाऐवजी धार्मिक मुद्दे पुढे करून देशातील बेरोजगारी, वाढती महागाई यासारख्या मुलभूत प्रश्नांवरून इतरत्र लक्ष विचलीत करीत असल्याचे टीकास्त्र काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आ. बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सोडले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या पदा धिकार्‍यांच्या बैठकीतमध्ये ते बोलत होते.

आ. थोरात म्हणाले, केंद्रात युपीए सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्यांसाठी राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा मुलभूत अधिकार यासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय होताना देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली होती, मात्र सध्या देशात धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे लोकशाहीस घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. राज्यभरात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. आगामी काळात राज्यासह देशात आश्चर्यकारक सत्ता बदल होईल आणि त्यात युवकांना मोठी संधी मिळणार असल्याचे आ. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी ठणकावून सांगितले. या बैठकीसाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

देशासह राज्यात नक्कीच सत्ता बदल होणार..!
राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. वज्रमूठ सभांसह सर्व निवडणुकांमध्ये जनतेचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यातून आगामी काळात देशासह राज्यात नक्कीच सत्ता बदल होणार असल्याचा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT