नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रमातील पालखी दिंडीचे हरिनामाचा जयघोष करत गुरुवारी (दि.15) आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. प्रस्थानाप्रसंगी पिचडगाव येथे ग्रामस्थ, विविध संस्थेच्या पदाधिकार्यांतर्फे आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. 'बा…विठ्ठला पाऊस पडू दे..रान शिवार फुलू दे..!', असे पांडुरंगाला साकडे घालणार असल्याचे दिंडी चालक ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी सांगितले.
तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रम प्रांगणातून हरिनामाचा गजर करत दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. आमदार शंकरराव गडाख यांनी वारकर्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळातर्फे दिंडीसाठी ताडपत्री व सतरंजी देण्यात आली.
या दिंडीमध्ये सुमारे दीडशे भाविकांचा समावेश असून, दिंडी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे, सीतारामबाबा गोधेगावकर, दत्तात्रय महाराज झेंडे यांचा दिंडीत समावेश आहे. या दिंडीचे लक्ष्मीनारायण जोंधळे, भगवानराव शेजूळ, रामकृष्ण कांगुणे, विठ्ठलराव सरोदे, ज्ञानेश्वर शिंदे, अंबादास ब्राम्हणे यांच्यातर्फे संतपूजन करून स्वागत करण्यात आले. नेवासा फाटा येथे माजी सरपंच पांडुरंग निपुंगे, मुकिंदपूर येथे सरपंच सतीश निपुंगे, माजी उपसरपंच अशोक निपुंगे यांनी दिंडीचे स्वागत केले.
दिंडीच्या स्वागतासाठी पिचडगाव ते नेवासाफाटा रस्त्यावर सुवासिनींनी रांगोळी घालून पंचारती ओवाळून स्वागत केले. माऊली आश्रम वारकर्यांसाठी आध्यत्मिक केंद्र असल्याने या आश्रमाच्या उत्कर्षासाठी भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा