नगर : पुढारी वृत्तसेवा : पेमराज सारडा महाविद्यालयाती एनसीसी अधिकारी कॅप्टन अंकुश आवारे यांनी नगर ते कन्याकुमारी, असा 1700 किलोमीटरचा प्रवास फिट इंडिया अभियानाचा भाग म्हणून पूर्ण केला. यानिमित्ताने त्यांचा सत्कार 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे प्रमुख कर्नल पंकज साहनी आणि प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नारायण दास यांनी केला. कर्नल साहनी म्हणाले, 'फिट इंडिया मिशन'अंतर्गत 57 महाराष्ट्र एनसीसी बटालियनने विविध उपक्रम आयोजिले होते.
यामध्ये एकता दौड, सायकलिंग, चालणे, योगा आणि व्यायाम आदींचा सामावेश होता. सर्वसामान्यांनी आरोग्याकडे लक्ष देऊन स्वत:चे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एनसीसीचे छात्र आणि अधिकारी प्रयत्न करत आहेत. 'फिट इंडिया मिशन'चा एक भाग म्हणून म्हणून कॅप्टन अंकुश आवारे यांनी एक हजार किलोमीटर सायकल चालविण्याचे आवाहन स्वेच्छेने स्वीकारले होते; मात्र ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कन्याकुमारीपर्यंत प्रवास करून 1700 किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला.
प्रवासा दरम्यान मार्गातील विविध एनसीसी बटालियनला भेट दिली.
कालीकल एनसीसी ग्रुपचे ब्रिगेडीअर ई गोविंद यांनी कॅप्टन अंकुश आवारे यांचे स्वागत केले. फिट इंडिया मिशनचा संदेश सायकलिंगच्या माध्यमातून पोहचविल्याबद्दल औरंगाबाद एनसीसीचे ग्रुपचे प्रमुख ब्रिगेडीअर एम. एम. विट्टेकर यांनी एनसीसी अधिकार्याचे अभिनंदन केले. पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य राजेद्र शिंदे, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी संजय जोशी, अनंत फडणीस, शिरीष मोडक, अजित बोरा यांनी अभिनंदन केले.
सायकल 'दैनंदिन प्रवासाचे, व्यक्तिगत आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने पूरक, असे वाहन ठरू शकते,' असा संदेश या सायकल यात्रेतून देण्याचा प्रयत्न होता. याखेरीज महाविद्यालयातील युवकांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करून पर्यावरण रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी हाही हेतू होता.
महाराष्ट्रातून नगर, फलटन, कोल्हापूर ते कर्नाटकातील बेळगावला, कारवार, भटकल, अडका, असा प्रवास करत ही सायकल यात्रा सातव्या दिवशी केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील थलसारी शहरात पोहचली. सायकलने पर्यटन, आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण, असा संदेश देत ही यात्रा कोचिन, त्रिवेद्रममार्गे कन्याकुमारीला बाराव्या दिवशी पोहचली.