रमेश चौधरी :
शेवगाव तालुका : अंतिम आणेवारी जाहीर करताना प्रशासनाने शेतकर्यांच्या भावनेचा विचार करावा, भाजपने याबाबत गतवर्षी केलेले आरोप लक्षात घेता दक्षता बाळगावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाने पिकांची नजर आणेवारी, तसेच सुधारीत आणेवारी 50 पैशाच्या पुढे लावण्याची चुक केली आहे. ही आणेवारी जाहीर होताच शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. तर, काही संघटनांनी आंदोलन केले होते.
नुकसानीचा सारासार विचार करता कमालीचे उत्पन्न घटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एक-दोन वेचणी होताच कपाशी पिक संपले. बाजरी, मूग, पिके हाताची गेली. यंदाही पावास सुरुवातीला लांबला होता. नंतर अतिवृष्टी झाली. यामुळे खरीपाची पिके कशीबशी जगवली होती. परंतु, नंतरच्या अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत.
वांरवांर हवामानात होणार्या बदलाने तुरी पिकांवर रोगाचा सतत प्रार्दुभाव झाल्याने उत्पन्नात घट झाली. हा सर्व विचार करता आता 15 डिसेंबर रोजी खरीप पिकांची अंतिम आणेवारी जाहीर करताना वस्तुनिष्ठ परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शेतकर्यांच्या भावनेचा विचार करावा, अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली. नसता प्रशासनाला शेतकर्यांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
गतवर्षी आघाडी शासनाच्या काळात अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या पुढे जाहीर होताच, भाजपने शेतकर्यांच्या बाजुने प्रशासनावर आरोप कले होते. तसेच, हे सरकार शेतकर्यांच्या विरोधात आहे, अतिवृष्टीने पिकांचे पंचनामे होऊनही त्यांना शेतकर्यांची तळमळ नाही, त्यामुळे अंतिम आणेवारी जास्त लावण्यात आल्याची खंत व्यक्त केली होती. आता, तिच परिस्थिती यंदाही आहे. राज्यात शिंदे सेना व भाजपचे सरकार सत्तेत असल्याने गतवर्षी व्यक्त केलेली खंत लक्षात घेता 15 डिसेंबरला खरीप पिकांची जाहीर होणार्या अंतिम आणेवारीबाबत भाजपने दक्षता घ्यावी, अशी मागणी होतेय.