अहमदनगर

अहमदनगर जिल्हा बँकेकडून 23 अब्ज पीककर्ज

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  खरीप हंगामासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत 2 हजार 307 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यातील 2 लाख 96 हजार शेतकर्‍यांनी पीककर्जाचा लाभ घेतला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी दर वर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांना भात, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, भुईमूग तीळ या खरीप पिकांबरोबरच ऊस, कांदा, भाजीपाला आदींसाठी कर्जपुरवठा केला जात आहे.

त्यासाठी हेक्टर कर्जाचा दर देखील निश्चित केलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला 2 हजार 800 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी उसाशिवाय यंदा 4 लाख 47 हजार 822 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वीच शेतकर्‍यांनी पीककर्ज उचलण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र, पावसाअभावी पेरणीला वेग आलेला नाही. आतापर्यंत फक्त 35 टक्के पेरणी झालेली आहे.

गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेच्या वतीने 2 लाख 7 हजार 15 कोटी 59 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. याचा लाभ 3 लाख 74 हजार शेतकर्‍यांनी घेतला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2 हजार 307 कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. एकंदरीत 84 टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

पीकनिहाय वाटप कर्जदर (हेक्टरी)
भात : 62 हजार 500, बाजरी : 75000, मका : 62 हजार 500, कापूस : 75000, सोयाबीन : 75000, तूर : 47250, मूग : 25750, उडीद : 26000, भुईमूग : 46750, ज्वारी : 75000, नाचणी 15000, ऊस आडसाली : 175000.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT