Latest

विधानपरिषद निकालानंतर कोणाकडे कौशल्य आहे हे कळेल; अजित पवारांचा इशारा

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निवडणूकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते असे म्हटले जाते. येणाऱ्या विधानपरिषद निवडणूक निकालानंतर हे कौशल्य कोणाकडे आहे आणि कोणाकडे काय आहे, हे कळेल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला. तसेच प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही त्या-त्या पक्षाची जबाबदारी असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

इथ बरं चाललय!

बारामती येथे पत्रकारांनी, विखे पाटील यांनी पवार यांना भाजपसोबत येण्याचे आमंत्रण दिल्यासंदर्भात विचारले असता, 'आमचं इथं बर चाललेय, कोणी काय वक्तव्य करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे', असे पवार म्हणाले. महाविकास आघाडीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात विधानपरिषद निवडणूक व्युहरचनेसंबंधी चर्चा होईल. यापूर्वीही प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे. आपापले उमेदवार निवडून आणणे हे त्या पक्षाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आडनावांवरून सर्व्हे नाही

ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक घेणार आहोत. केवळ आडनावांवरून हा सर्व्हे होणार नाही. काही आडनावे सर्व जातींमध्ये आढळतात, तो निकष वापरून ओबीसी ठरवता येणार नसल्याचे पवार म्हणाले.

देहूतील कार्यक्रमाविषयी बोलायचे नाही

देहूतील कार्य़क्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादीने निषेध केला होता. यासंबंधी पवार म्हणाले, देहूतील कार्यक्रमाबाबत मला काहीही बोलायचे नाही. हा कार्यक्रम होऊन बराच काळ झाला आहे. पंतप्रधान दिल्लीत पोहोचले. तो अतिशय चांगला कार्य़क्रम झाला. देहू हे वारकरी सांप्रदायातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे आणि त्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहिले, असे सांगत त्यांनी वादावर काहीही न बोलणेच पसंत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT