सातारा; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सातारकरांना रक्षाबंधन या सणादिवशी बसला. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यावेळी नागरिकांकडून महावितरणच्या कार्यालयात याबाबत विचारपूस केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सणादिवशीच विजेचा लपंडाव सुरू असल्याने सातार्यात पॉवर लेस रक्षाबंधन साजरा झाल्याने महावितरण विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील वीज पुरवठा विविध कारणांमुळे विस्कळीत होत आहे. अचानक रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होणे, दिवसा केव्हाही सलग दोन ते चार तास वीज खंडित होणे, असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याचा सर्वाधिक फटका हा बाजारपेठेतील व्यापार्यांना बसत आहे. याबाबत ग्राहकांनी काही तक्रार केल्यास महावितरणच्या कर्मचार्यांडून उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे तक्रार केली असता, लाईन खराब झाली आहे, बदलावी लागेल, या कामाला वेळ लागेल, अशी उत्तरे देण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून वीज नसल्यामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात पावसाला सुरुवात झाली की वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा सातारकरांना येवू लागला आहे.
उन्हाळ्यामध्ये महावितरणतर्फे धोकादायक झाडे, फांद्या हटवण्यात आल्या, डीपीच्या दुरूस्तीची कामे करण्यात आली, खराब लाईन बदलण्यात आले, पोल बदलण्यात आले. ही सर्व कामे केल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांची गैरसोय होत असतानाच त्यावर कळस करुन कर्मचारी उध्दट वागणूक ग्राहकांना देत आहेत. याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. मोठ्या इमारती व कार्यालयांमध्ये नागरिकांना लिफ्टसाठी जनरेटर सुरू करावे लागत आहेत. सलग वीज खंडित असल्याने इन्व्हर्टर उपयुक्त ठरत नाही. गिरणी व लाँड्री व्यवसायिकदेखील दिवसातून दोन-तीन वेळा बत्ती गुल होत असल्यामुळे त्रस्त आहेत. त्यातच गुरुवारी सणादिवशीच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने सातारकरांचा पॉवर लेस रक्षाबंधन साजरा झाला. यामुळे अधिकारी नक्की काय करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या आहेत. काही ठिकाणी वीज पोल वाकले आहेत. डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाले असून अनेक ठिकाणचा वीजपुरवठा दोन-तीन दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्याची काटकसर करुन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.