Latest

सातारा : शर्यतींमुळे येणार जत्रेतील अर्थकारणाला गती

सोनाली जाधव

सातारा : पुढारी वृत्तसेवा
अखेर एकदाच्या बैलगाडी शर्यती सुरू झाल्याने शर्यतींवर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायांना पुन्हा सोन्याचे दिवस येणार आहेत. दरम्यान शर्यती सुरू झाल्याने यात्रांमधील ग्रामीण अर्थकारणाला वेग येणार असून शौकिनांचा उत्साहही दुणावला आहे.

गेली अनेक वर्षे बैलगाडी शर्यती बंद राहिल्याने आणि त्यातच कोरोनाचे संकटही सुमारे दोन वर्षे टिकल्याने ग्रामीण यात्रा, जत्रांचा नूर फिका झाला होता. यात्रेला येणार्‍या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. पण, अखेर बैलगाडी शर्यती सुरु झाल्याने आता यात्रा-जत्रांतील शर्यतींंना बहार येणार आहे. यात्रेतील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना गती मिळणार आहे. यात्रेतील शर्यतींच्या अड्डयांवर सुमारे लाखो रुपयांची उलाढाल होतेच. यामुळे अर्थातच जत्रेतील अर्थकारणाला गती येणार आहे.

यावर्षीच्या मोठ्या यात्रा संपल्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक गावच्या यात्रेवेळी बैलगाडी शर्यतींचे आयोजन होेते. या शर्यतींमुळे बैलगाडी, छकाटा निर्मिती, खिल्लार, म्हैसूरी खोंडांनाही मोठी मागणी वाढणार आहे. मध्यंतरी बैलगाडी शर्यती बंद असल्यामुळे मागील 3 वर्षात यात्रेतील आर्थिक उलाढालीला मोठा ब्रेक लागला होता. काही ठिकाणी यात्रा मोडकळीस येतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने यात आणखी भरच पडली.आता हे संकट गेले असून बैलगाडी शर्यतीही सुरु झाल्याने यात्रा-जत्रांवेळी या शर्यतींना चांगलाच बहर येणार आहे. अर्थातच यावेळी शर्यती पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळणार आहे.

ग्रामीण यात्रांतील रंगत वाढणार..

वाहतुकीमधून किमान अडीच ते तीन लाख रुपये, शर्यती प्रवेश फीमधून एक ते दिड लाख रुपये, हॉटेल व्यवसाय, रसवंती गृहे, आईस्क्रीम पार्लर, चहा, पान टपर्‍यांची सुमारे 2 तेे 3 लाखांची उलाढाल शर्यतीच्या ठिकाणी होणार आहे. अर्थातच यात्रांवेळी आयोजित केल्या जाणार्‍या शर्यतींमुळे यात्रांमधील आर्थिक उलाढालीला चालना मिळणार आहे.

यात्रांवेळी होणार लाखोंची उलाढाल

बैलांना लागणारा खुराक, पशुखाद्याला मागणी वाढणार आहे. शर्यतींसाठी आवश्यक असणारे छकाटे, बैलगाडी निर्मितीचा व्यवसाय पुन्हा तेजीत येणार आहे. छकड्यांचा खप वाढणार आहे त्याचबरोबर दोरखंड, वेसणी यांचा खपही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शर्यतीच्या ठिकाणी बैलगाड्या, छकडे, बैलांना ने-आण करण्यासाठी टेंपो व अन्य वाहनांची मोठी वर्दळ वाढणार आहे. त्यातही मोठी उलाढाल होईल.

SCROLL FOR NEXT