Latest

सातारा : वारकर्‍यांनो, थेट घरापासूनच जावा पंढरीला

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा

विठूरायाच्या दर्शनाची वारकर्‍यांना आस लागून राहिली आहे. एकाच गावातील वारकर्‍यांनी समूहाने एसटीचे बुकिंग केल्यास त्याच गावातून एसटी सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने घेतला आहे. त्यामुळे वारकर्‍यांना थेट घरापासूनच पंढरीला जाण्याची सुविधा मिळणार आहे. 40 वारकर्‍यांनी समूहाने पंढरपूरला जाण्यासाठी एकत्र आल्यास त्यासाठी एसटीने हा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. वारकर्‍यांना विठूरायाच्या दर्शनासाठी ओढ लागली आहे. आता वारकर्‍यांच्या मदतीसाठी एसटी धावली आहे. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त वातावरणात यंदा पंढरीची वारी भक्तिभावाने पार पडणार आहे. या निमित्त राज्यातूनच नव्हे तरी देशभरातील वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या काठी जमणार आहे. या वारकरी आणि विठ्ठल भक्ताचा प्रवासा सुखाचा व्हावा यासाठी एसटीही सरसावली आहे.

पंढरपूरची आषाढीयात्रा हा सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असतो. वारकर्‍यांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेवून जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकाच गावातील वारकर्‍यांनी समूहाने एसटीचे बुकींग केल्यास त्यांच्या गावातून एसटी सोडण्याची व्यवस्था महामंडळाच्या सातारा विभागाने केली आहे.

40 वारकरी समूहाने एकत्र बुकिंग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी वारकर्‍यांना घेऊन पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. त्यामुळे वारकर्‍यांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, पारगाव खंडाळा, कोरेगाव, फलटण, वडूज, दहिवडी, मेढा, महाबळेश्वर आगारातील अधिकार्‍यांशी गावातील नागरिकांनी समूह बुकिंगसाठी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच एका गावात 20 वारकरी व दुसर्‍या गावात 20 वारकरी असे मिळूनही समूह बुकिंग केल्यास त्या दोन गावातूनही एसटी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. एसटी महामंडळाच्या अभिनव उपक्रमामुळे वारकर्‍यांनी समुह बुकिंग केल्यास गावातच एसटी उपलब्ध होणार आहे. वारकर्‍यांची एसटीकडून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी चांगली सेवा देण्याचा निर्णय महामंडळामार्फत घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकाच गावातील 40 वारकरी नागरिकांनी एसटीचे समूह बुकिंग केल्यास गावातूनच बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जिल्ह्यातील नजीकच्या आगाराशी संपर्क साधावा.

– सागर पळसुले, विभाग नियंत्रक

SCROLL FOR NEXT