सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जोरदार वारे व पावसाच्या सरी, दाट धुके यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पावसामुळे शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली या तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे सर्वत्र राडारोडा निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. धरण परिसरातही पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
सोमवारी सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पश्चिम भागातील घाट रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच भात लागणीची कामेही युध्दपातळीवर सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पूर्व भागातही पेरणीच्या कामांना गती आली आहे. पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी शहर व परिसरातील दुकानामध्ये छत्र्या, रेनकोटस, जर्कीन्स, टोप्या, पावसाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.
सातारा जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 26.60 मि.मी., जावली 31.50 मि.मी., पाटण 68.00 मि.मी., कराड 23.10 मि.मी., कोरेगाव 9.40 मि.मी., खटाव 4.70 मि.मी., माण 1.50 मि.मी., फलटण 3.30 मि.मी., खंडाळा 18.50 मि.मी., वाई 23.30 मि.मी., महाबळेश्वर 82.60 मि.मी.पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.