सांगली : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारच्यावतीने राबवण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा' अभियान स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्थातून जिल्ह्यातील दिघंची, कामेरी, आरग आणि नांद्रे ही चार गावे राज्यात अव्वल ठरली आहेत. विभागामध्ये सहा गावांना हे स्थान मिळाले आहे. त्यात जिल्ह्यातील या चार गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग आणि चार गावांचा रविवारी (दि. 5) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्यावतीने गेल्या वर्षीपासून 'माझी वसुंधरा' हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 699 पैकी 697 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेऊन आघाडी घेतली होती. पर्यावरणाचा होत असलेला र्हास थांबवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंच तत्त्वावर ग्रामपंचायतीने काम करायचे होते. त्यासाठी साडेपाच हजार गुणाची क्षमता असणारी हे अभियान ठेवण्यात आले होते. सांगली जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने ऑक्टोबरपासून या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत आघाडी घेतली होती. वृक्षलागवड, हरित क्षेत्र विकसित करणे, वृक्ष आराखडा करणे, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, ई-वेस्ट व्यवस्थापन, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, फटाके बंदी, घनकचरा व्यवस्थापन, उज्ज्वला गॅस योजना, सायकल ट्रॅक, पाणलोट विकास प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी बजेट, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, पाणी शुद्धीकरण व सुशोभीकरण, विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन प्रकल्प, सण-उत्सव यावेळी प्रदूषण रोखणे, धार्मिक कार्यक्रमात इको फ्रेंडली मूर्तीचा वापर, सोलर लाईट, सोलर प्रकल्प, कृषी सोलर प्रकल्प योजना इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींची तपासणीसाठी निवड करण्यात आली होती. त्यातून दिघंची, कामेरी, आरग, आणि नांद्रे या चार गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.