कुरूंदवाड, पुढारी वृत्तसेवा : नव्या युगानुसार शेतकर्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांचा शेतकर्यांनी लाभ घेतल्यास शेतीत आधुनिकता निर्माण होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
येथील एस. पी. हायस्कूल क्रीडांगणावर मयूर उद्योग समूह, कोल्हापूर व डॉक्टर अंकल आयोजित मयूर कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी गटनेते दरेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे महाराजा मुधोजीराजे भोसले होते. यावेळी मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, संघटक मकरंद देशपांडे, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आदी उपस्थित होते.
डॉ. संजय पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाच्या बँक वॉटरने शिरोळ तालुक्यात महापूर आला आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. यावर कायमचा तोडगा काढावा. तसेच शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा करावा. यावेळी मुधोजीराजे भोसले यांचे भाषण झाले. डॉ. विक्रम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रदर्शनानिमित्त 300 पेक्षा अधिक दालने उभारली आहेत. दि. 10 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.