कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील (वय 7) खुनातील आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याचे वकील खटला सुनावणीच्या पहिल्याच दिवशी सोमवारी न्यायालयात अनुपस्थित राहिले. विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव – पाटील यांनी आरोपीचा जामीन अर्ज आणि दोषारोप निश्चितीकरणासाठी लेखी स्वरूपात प्रारूप आरोप दाखल केले.
खटल्याची पुढील सुनावणी दि. 20 जुलै रोजी होणार आहे. यादिवशी जामीन अर्जासह दोषारोप निश्चितीसंदर्भात सरकार पक्ष व बचाव पक्षाकडून युक्तिवाद होईल, असेही सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वरद पाटील खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात सुरू झाली आहे.
अॅड. यादव-पाटील सकाळी न्यायालयात उपस्थित राहिले. मात्र, आरोपीचे वकील अनुपस्थित राहिल्याने अॅड. यादव यांनी न्यायाधीश गोंधळेकर यांच्याकडे लेखी म्हणणे सादर केले.
20 जुलैला आरोपीला कोर्टात हजर करण्याचे निर्देश
बंदोबस्ताअभावी आरोपीला आज न्यायालयात हजर करता आले नाही. 20 जुलैला होणार्या सुनावणीसाठी संशयिताला हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आजच्या सुनावणीवेळी वरदचे आई, वडील, नातेवाईकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.