Latest

लता मंगेशकर : जीवनसमृद्ध गाणे!

Arun Patil

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळं एका युगाचा अंत झाला आहे. आपल्या सर्वांच्या अतिशय जवळचा सुरेल सूर हरपला आहे. त्यांच्या जाण्यानं प्रत्येक जण हळहळण्याचं कारण म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत या-ना त्या रूपानं आपल्या कानावर लतादीदींचे अवीट सूर येतात आणि आनंदानं आयुष्य घालवण्यास ते मदत करतात. 1942 ते 2015 या 70 वर्षांच्या काळात 25 हजार गाणी लताजींनी गायिली. हे जगातील आश्‍चर्यच आहे.

एका गाण्यासाठी तीन-चार तास रिहर्सल, रेकॉर्डिंगसाठीचा वेळ या सार्‍याचा हिशेब घातला तर अख्खं आयुष्य कमी पडेल. पण, लताजींनी यातील कित्येक गाणी 'वन टेक'मध्ये गायिली आहेत. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी एका नॉर्वेजियन इंडो पाक समलिंगी सिनेमासाठी 'जीना क्या है जाना मैने' हे गाणं गायलं. त्यावेळी त्यांचं वय होतं 84 वर्षे. 2019 मध्ये 'सौगंध मुझे इस मिट्टी की…' हे भारतीय जवानांना समर्पित असणारं गाणं गायलं.

लताजींना पहिला ब्रेक दिला 1948 मध्ये गुलाम हैदरनी. त्यापूर्वी सुरैया, नूरजहाँ, शमशाद आदी गायिका सिनेमाविश्‍वात प्रस्थापित झालेल्या होत्या. लताजी सिनेमाविश्‍वात दाखल झाल्या तेव्हा सुरुवातीला आवाज बारीक असल्यानं त्यांना नाकारण्यात आलं. ही मुलगी कशी टिकून राहणार, असं त्यांच्याकडे पाहिलं गेलं.

हिंदी भाषेची जाण असली तरी त्यांचं उर्दू फारसं चांगलं नव्हतं. अनिल विश्‍वासनी दिलीप कुमारांशी लताजींची ओळख करून दिली आणि ही पुढं जाऊन चांगली गायिका बनेल असं सांगितलं तेव्हा दिलीपकुमारनं महाराष्ट्रीय गायकांना उर्दू उच्चार जमत नाहीत असं म्हणून लताजींच्या गायकीबाबत साशंकता व्यक्‍त केली होती. ही बाब दीदींना खूप लागली असावी. त्यामुळं त्यांनी उर्दू शिकून घेतली आणि नंतरच्या काळात अनेक गझल आपल्या स्वरांनी अजरामर केल्या. इतकंच नव्हे तर पुढील आयुष्यात त्यांनी एकंदर 36 भाषांमध्ये गाणी गायिली !

आपल्या गोड गळ्यानं लाखो रसिकांना मोहीत करत असतानाच 'साधी माणसं', 'राम राम पाव्हणं', 'मोहित्यांची मंजुळा', 'मराठा तितुका मेळवावा' यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी लतादीदींनी संगीतही दिलं. लताजींच्या गायन कारकिर्दीचा कालखंड मोठा असल्यानं त्यांनी बहुतांश गायकांबरोबर ड्युएटस् गायिली. किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी, महेंद्र कपूर यांच्यापासून ते पंकज उदास, शब्बीर कुमार, शैलेंद्र कुमार, उदित नारायण, कुमार सानू, सोनू निगम, अदनान सामी, ए. आर. रहमान अशा जवळपास तीन पिढ्यातील गायकांच्याबरोबरीनं ही स्वरसम्राज्ञी गायिली.

कित्येक नवीन संगीतकारांच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी स्वर दिले. लता आणि आशा यांनी गायिलेली ड्युएटस् सुपरहिट ठरली. ती ऐकताना त्यातील आवाजाचा सुरेख मिलाफ स्तिमीत करून जातो. 'मन क्यूं बहका रे बहका', 'सखी रे सून बोले पपीहा' हे खमाज रागातील गीत, 'कर गया रे मुझपे जादू' हे दरबारी रागातलं गीत, 'मन भावन के घर गाये जोरी' हे भैरवीतील गीत अशी गाणी ऐकताना अक्षरशः तल्लीन व्हायला होतं.

मला आठवतं, पूर्वीच्या काळी घराघरांमध्ये रोजची सकाळ ही रेडिओवरील भावगीते, भक्‍तिगीते ऐकत उजाडायची. यातील लताजींची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला,' ' मुकुंदा रुसू नको इतका..', 'रघुनंदन आले आले', 'शरण तुला भगवंता', 'श्रीरामा भगवंता…', 'श्रीरामा घनश्यामा', 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी', 'सुंदर ते ध्यान' यांसारख्या भक्‍तिगीतांतून लोकमानसावर एक प्रकारचे संस्कार होत गेले.

लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातील माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची 1945 ते 1960 या काळातली गाणी आवर्जून ऐकावी असं मी सांगेन. कारण आज इतक्या वर्षांनंतरही ती ऐकताना जराही कंटाळवाणं होत नाही. ही त्यांच्या आवाजाची किमया आहे. 'तुम क्या जानो तुम्हारी याद में' हे पी. एल. संतोषी यांनी लिहिलेलं गाणं ज्या दर्दभर्‍या आवाजात लताजींनी गायलं आहे त्याला खरोखरीच तोड नाही.

'सय्या' चित्रपटातील 'ये काली काली रात…' हे गाणं सज्जाद हुसेन यांनी संगीतबद्ध केलं होतं. पण, त्यावेळी हा चित्रपट चालणार नाही असं वाटल्यानं तो तयार होऊनही प्रदर्शित केला गेला नाही. एचएमव्हीनं त्या गाण्यांच्या रेकॉर्डस्ही काढल्या नाहीत. पुढं कोलकात्याला हा चित्रपट रीलिज झाला आणि तो एका महिलेनं पाहिला. त्यांनी एचएमव्हीला पत्र लिहिलं आणि इतकी सुंदर गाणी तुम्ही बाजारात का आणली नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर एचएमव्हीनं ती रीलिज केली आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. नंतरच्या काळात लता मंगेशकर यांनी एक कार्यक्रम केला होता. त्यामध्ये 50 जुन्या गाण्यांचा मुखडा आणि पहिलं कडवं त्यांनी गायलं होतं. त्या कार्यक्रमात हे गाणं ऐकल्यानंतर सर्वजण अक्षरशः हादरून गेले होते.

लताजींच्या अशा असंख्य गाण्यांनी माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांचं भावविश्‍व व्यापून टाकलं आहे. 'अच्छा होता न दिल में तू आया न होता…', ' ये दिल मचल मचल के यूं रोता है…', 'तेरा दर्द दिल मे बसा लिया', 'मैं अपने दिल का अफसाना सुनाऊं फिर चले जाना', 'आज मेरे नसीब में' यांसारख्या गाण्यांतील लताजींचा आवाज ऐकताना अंग शहारून जातं. 'हाय जिया रोये' या गाण्यामध्ये त्यांचा वरच्या पातळीवर गेलेला आवाज ऐकून थक्‍क व्हायला होतं.'लूट गयी उम्मीदोंकी दुनिया' या गोरखकल्याण रागातल्या गाण्यात अतिशय पातळ झालेला लताजींचा आवाज केवळ अप्रतिम !

पंडित भीमसेन जोशी म्हणत की, लताचा गळा म्हणजे भारताला लाभलेली एक देणगी आहे. पु. ल. देशपांडे म्हणायचे, लता मंगेशकर यांच्यामुळे सुरेल संगीत म्हणजे काय हे भारताला कळालं. कुणी बेसूर झाला तर ते आपल्याला समजतं ते लताजींमुळेच! लताजींचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गीतातील भावना व्यक्‍त करायला कित्येक गायकांना बरीच मेहनत घ्यावी लागायची; पण त्या काही मिनिटांतच गीतातील सर्व भावना आपल्या स्वरांतून अतिशय चपखलपणानं उतरवत असत. संगीतातील राग गायिले जातात तेव्हा त्यातून भावविश्‍व निर्माण होणं गरजेचं असतं. हे भावविश्‍व लताजींच्या प्रत्येक गाण्यात मला दिसतं.

जुन्या गाण्यांमध्ये ते ओतप्रोत भरलेलं असायचं. खास करून 1950 ते 1960 च्या काळातील गाण्यांच्या इतकं प्रेमात पडायला होतं की, ती ऐकल्यानंतर त्या भावविश्‍वातून बाहेर पडणं कठीण होतं. बडे गुलाम म्हणायचे की लताजी कधीच बेसूर व्हायच्या नाहीत. हे अजब रसायन आहे ! अनेकांना हे माहीत नसेल, पण 'नागीन' चित्रपटातील 'तेरे संग प्यार में…' आणि 'दिल तुझको दिया' या चित्रपटातील 'वादा न तोड' ही लताजींची दोन गाणी 'इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड'मध्ये घेण्यात आली आहेत.

लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लहानपणीची गरिबी, बालवयापासून केलेले परिश्रम, नाटकात केलेलं काम, चित्रपटात केलेलं काम, कुटुंब सावरण्याची जबाबदारी आणि हा सगळा संघर्ष करत असताना आपल्या आवाजाला रियाजाची, अभ्यासाची जोड देत पुढं जाणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. कारण त्यातूनच त्यांना ती उंची गाठता आली.

लताजींनी कधीच हार मानली नाही, ही बाब आपण सर्वांनी शिकली पाहिजे. सर्वोत्कृष्टपणा येण्यासाठी जितके परिश्रम घ्यावे लागतील ते घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. लता मंगेशकर यांचा संपूर्ण काळ आठवताना मला त्यांच्या आवाजामध्ये माणुसकीचा, वात्सल्याचा, आशावादाचा, आपुलकीचा भाव आढळतो. 'अल्ला तेरो नाम ईश्‍वर तेरो नाम' म्हणणारी लता कालातीत होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT