नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यात असलेली सवलत तत्काळ पूर्ववत बहाल करण्याची शिफारस केली आहे. किमान स्लिपर आणि थर्ड एसी कोचमध्ये ही सवलत तत्काळ दिली जावी, असे समितीने म्हटले आहे.
तीन वर्षांपासून ही सुविधा बंद होती. त्यामुळे गरीब वर्गाला आर्थिक फटका बसत होता.
भाजप नेते राधा मोहन सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. गरजूंना या सुविधेचा लाभ मिळावा. ज्येष्ठांच्या सवलतीमुळे रेल्वेवर दरवर्षी 2000 कोटी रुपयांचा बोजा पडतो. समितीने 4 ऑगस्ट रोजी या शिफारशी सोपवल्या आहेत. अहवालात समितीने म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी रेल्वेभाड्यात 40 ते 50 टक्के सवलत दिली जात होती; पण कोरोना महारोगराई काळात ती सवलत बंद केली होती.