नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे विभागाने मालवाहतुकीतून भरघोस उत्पन्नाची कमाई केली आहे. सप्टेंबर महिन्यात रेल्वेकडून 106 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली. सप्टेंबर 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 3.62 टक्क्यांनी जास्त असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. गतवर्षी 102.30 दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती. विशेष म्हणजे, गेल्या महिन्याभरात रेल्वे विभागाने या मालवाहतुकीतून 10,815.73 कोटींची कमाई केली आहे.
सप्टेंबर 2020 च्या 9,905.69 कोटींच्या तुलनेत हे प्रमाण 9.19 टक्क्यांनी जास्त असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या काळात भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून 10,815.73 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि हे उत्पन्न गेल्यावर्षी याच काळात झालेल्या (9,905.69 कोटी) उत्पन्नाच्या तुलनेत 9.19 टक्के जास्त आहे.
गेल्या महिन्यात रेल्वेने सर्वाधिक प्रमाणात कोळशाची वाहतूक केली. 47.74 दशलक्ष टन कोळशाची रेल्वेने वाहतूक केली. कोळशाखालोखाल 11.24 दशलक्ष टन लोह खनिज, 6.46 दशलक्ष टन अन्नधान्य, 4.19 दशलक्ष टन खते, 3.60 दशलक्ष टन खजिन तेल आणि 6.15 दशलक्ष टन सिमेंटची मालवाहतूक करण्यात आली. मालवाहतुकीची प्रक्रिया अधिक आकर्षक करण्यासाठी रेल्वेतर्फे अनेक सवलती आणि सूट दिली जात आहेत, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना महारोगराईदरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना एक संधी समजून रेल्वे विभागाने सर्वांगीण क्षमता आणि कामगिरी उंचावण्यासाठी कार्य करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.