मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात नियंत्रणात आलेला कोरोना मृत्यूचा दर गेल्या दोन दिवसांत वाढलेला दिसून आला. यात हजार अतिरिक्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.03 वर पोहोचला आहे.
एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर उशिराने अद्ययावत होत आहेत. जुन्या अतिरिक्त मृत्यूंचा समावेश राज्याच्या एकूण मृतांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या वाढली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
यापूर्वी राज्यात सोमवारी केवळ 51 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी 44 मृत्यू हे मागील 48 तासांतील, तर 7 मृत्यू हे मागील आठवड्यातील होते. यादरम्यान एकही जुना अतिरिक्त मृत्यू बाकी नव्हता. मृतांचा एकूण आकडा 1 लाख 23 हजार 136 इतका होता.
गेल्या दोन दिवसांपासून मात्र अतिरिक्त मृत्यू वाढले आहेत. राज्यात शुक्रवारी 121 रुग्ण दगावले. मात्र, त्यापैकी एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीच्या 318 मृत्यूंची नोंद कोव्हिड पोर्टलवर करण्यात आली, त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1 लाख 24 हजार 296 इतकी झाली. शनिवारी 200 मृत्यू झाले.
मात्र, त्यासह जुन्या 538 मृत्यूंची नोंदही करण्यात आली. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1 लाख 25034 इतका झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत राज्यात 1177 मृत्यूंची भर पडली आणि त्यात 856 जुन्या अतिरिक्त मृत्यूंचा समावेश होता.