कोल्हापूर, राजेंद्र जोशी : साखरेचे समाधानकारक उत्पादन, इथेनॉल उत्पादनाची पेट्रोलमधील 20 टक्के मिश्रणाकडे चाललेली वाटचाल यापाठोपाठ यंदा अन्नधान्याच्या उत्पादनामध्येही आजपर्यंतचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 या पीक वर्षामध्ये 324 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन गतवर्षीपेक्षा अडीच टक्के म्हणजेच 8 दशलक्ष मेट्रिक टनाने अधिक होईल आणि अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये आजपर्यंतचा नवा विक्रम प्रस्थापित होईल, असे कृषी खात्याचे अनुमान आहे.
केंद्र सरकारकडे देशातील विविध राज्यांच्या कृषी विभागांनी उत्पादनाच्या दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय कृषी मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे. याविषयी पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय अन्य माहिती स्रोताआधारे विशेषतः उपग्रहाच्या छायाचित्रांचाही आधार घेऊन पीकनिहाय उत्पादनाविषयी अंतिम चित्र स्पष्ट केले जाईल. देशातील अन्नधान्याच्या उत्पादनवाढीला यंदा भाताच्या उत्पादनाने मोठा हातभार लावला आहे. 131 दशलक्ष टन भाताचे उत्पादन या पीक वर्षात होईल, असा अंदाज आहे.
त्याखालोखाल गव्हाचे 112 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असून, डाळींचे उत्पादन 28 दशलक्ष मेट्रिक टनावर जाईल, असे अनुमान आहे. भात, गहू, डाळींच्या उत्पादनामध्ये समाधानकारक वाढ होत असताना तृणधान्यांच्या उत्पादनामध्ये मात्र अपेक्षेइतकी समाधानकारक स्थिती नाही. बाजरीच्या उत्पादनात अत्यंत माफक वाढ दिसत असली, तरी ज्वारी आणि नाचणी उत्पादनामध्ये घट होईल, असा अंदाज आहे. तृणधान्यांच्या या घसरलेल्या उत्पादनामागे शेतकर्यांची भात उत्पादनाला दिलेली प्रथम पसंती कारणीभूत आहे.