ब्रिस्बेन, वृत्तसंस्था : मोहम्मद शमी याच्या मॅजिकल षटकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. शमीने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे एकापाठोपाठ एक असे चार गडी बाद केले. त्यात एक धावबाद होता. विराट कोहलीने टीम डेव्हिडचा अप्रतिम असा झेल पकडला अन् सामना भारताच्या बाजूने फिरवला.
टीम इंडियाचा पहिला सराव सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झाला. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ऑस्ट्रेलियाला 187 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य गाठणार होता; परंतु मोहम्मद शमीने 11 धावांचे रक्षण शेवटच्या चार चेंडूत एका धावचितसह चार गडी बाद करीत भारताला 6 धावांनी विजय मिळवून दिला.
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. तर दुसर्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा याला खाते उघडण्यासाठी पाचवे षटक लागले. लोकेशने 27 चेंडूंत 50 धावा करताना 3 षटकार व 6 चौकार खेचले. त्या पाठोपाठ रोहित व विराट कोहली यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पंड्याने केवळ 2 धावा केल्या, पण सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करताना 33 चेंडूंत 50 धावा केल्या. भारताने 20 षटकांत 7 बाद 186 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श व अॅरोन फिंच यांनी भारतीय गोलंदाजांना चोपत पॉवर प्लेमध्ये 64 धावा काढल्या. 35 धावा करणार्या मार्शचा भुवनेश्वर कुमारने त्रिफळा उडवला. स्टीव्हन स्मिथ 11 धावा करत चहलच्या फिरकीवर त्रिफळाचीत झाला. फिंच एका बाजूने चांगली फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. मॅक्सवेलचा 19 धावांवर यजुवेंद्र चहलने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सोडला. पण, भुवनेश्वर कुमारने 16 व्या षटकात मॅक्सवेलला 23 धावांवर बाद केले, तर मार्कस स्टॉयनिस 7 धावा करत अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण एका बाजूने फिंच किल्ला लढवत होता.
भारत : 20 षटकांत 7 बाद 186 धावा. (के. एल. राहुल 57, सूर्यकुमार यादव 50. केन रिचर्डसन 4/30)
ऑस्ट्रेलिया : 20 षटकांत सर्वबाद 180 धावा. (अॅरोन फिंच 76, मिचेल मार्श 35. मोहम्मद शमी 3/4.)
हे ही वाचा…