मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी असे मुंबई काँग्रेसचे मत असले तरी पालिकेतील काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांनी मात्र शिवसेनेसोबत आघाडी करावी, असे मत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.
गुरुवारी जगताप यांनी काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलावली होती. स्वबळावर निवडणूक लढवल्यास काँग्रेसला अनेक जागांवर फटका बसू शकतो. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारासमोर आपल्या उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल.
दोन्ही पक्षांच्या युतीमुळे ज्या जागा आपण काठावरील मतांनी जिंकल्या आहेत,त्या जागाही धोक्यात येऊ शकतात. काही जागा हातातून जातील, या शक्यतेकडे नगरसेवकांनी जगताप यांचे लक्ष वेधले. यंदा प्रभाग रचनाही बदलली आहे, त्यामुळे स्वतंत्र न लढता शिवसेनेसोबत युती केल्यास सत्तेत येऊ, असे स्वप्नही काहींनी स्पष्टपणे बोलून दाखवल्याचे समजते.
नगरसेवकांना प्रत्येक मुद्द्यावर मत मंडण्याची मुभा दिली होती. त्यांनी आपली भूमिका मांडली त्याबाबतचा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवणार असल्याचे जगताप यांनी 'पुढारी'ला सांगितले.