मुंबई: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानावर आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दहीहंडी उत्सवात शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून हंडी फोडली. यावेळी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये शुक्रवारी राजकीय दहीहंडी बघायला मिळाली.
वरळीच्या आमदाराने आम्हाला शहाणपणा शिकवू नये. वरळीचा आमदार भाजपच्या मतांवरच निवडून आला, असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी केला. यावर प्रतिउत्तर म्हणून आजच्या दिवशी टोमणे व टीका म्हणजे बालीशपणा असल्याचे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये शुक्रवारी राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळाला. वरळी येथील जांबोरी मैदानात शिवसेनेचे दहीहंडी होत असे. वरळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर सुनील शिंदे तीन आमदार असतानाही यावेळी भाजपने जांबोरी मैदानावर ताबा मिळवला. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जांबोरी मैदानावर झालेल्या दहीहंडी उत्सवात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली. आम्ही गड वगैरे काही मानत नाही, आदित्य ठाकरे स्वत: आमच्या मतांच्या जिवावर निवडून आले आहेत. यावर शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी देखील आशिष शेलार यांना खुले आव्हान देत वरळीतून निवडणूक लढवून जिंकून दाखवा असे सांगितले.
यावर आदित्य ठाकरे यांनी दहीहंडीच्या दिवशी आरोप प्रत्यारोप करणे म्हणजे बालिशपणा असल्याचा टोला शेलार यांना लगावला. शेलार यांनी वरळी येऊन बघावी. वरळी आता सर्वांना आवडायला लागली आहे. दहीहंडी उत्सव कार्यकर्त्यांना आमने-सामने आणून वाद घालण्याचा दिवस नाही. लोक उत्सवाचा आनंद घेत आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण नको, असा सल्लाही ठाकरे यांनी यावेळी शेलार यांना दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही 50 थराची हंडी या अगोदरच फोडली असल्याचा टोला शिवसेनेला लगावला. त्यामुळे वरळी मधील राजकारण चांगले तापले आहे.