नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सात बंदरांवर 'रो-पॅक्स' फेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने घेतला आहे. सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या अतिरिक्त प्रकल्पाचे नियोजन करण्यात येईल. प्रकल्पाअंतर्गत घोडबंदर, वेलदूर, वसई, काशीद, रेवस, मनोरी आणि जेएन बंदरांवर ही सेवा सुरू करण्याचा केंद्राचा मानस आहे.
गुजरातमधील पिपावाल आणि मुलद्वारका येथे देखील अशाप्रकारे अतिरिक्त प्रकल्प हाती घेण्यात येतील. याशिवाय आंधप्रदेशात 4, ओडिशात 2 आणि तामिळनाडू व गोव्यात प्रत्येकी एका प्रकल्पाला मंत्रालयाकडून साहाय्य करण्यात येईल.
यापूर्वी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत गुजरातमधील घोघा-हाजिरा आणि राज्यातील मुंबई-मांडवा दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवा कार्यान्वित केली आहे. या सेवांनी सात लाखांहून अधिक प्रवासी आणि 1.5 लाख वाहनांची वाहतूक केली असून, स्वच्छ पर्यावरणासह सार्वजनिक वाहतुकीत मोलाचे योगदान दिल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. फेरी सेवेची अफाट क्षमता, सुस्पष्ट लाभ, यश, प्रचंड मागणी आणि क्षमता लक्षात घेता मंत्रालय 45 प्रकल्पांना आर्थिक सहाय्य करीत आहे. याचा एकूण प्रकल्प खर्च 1900 कोटी रुपये आहे.
देशात रो-रो (रोल-ऑन, रोल-ऑफ) फेरी आणि जलमार्ग वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिसंस्था विकसित करण्यास सुरुवात केली आहे.प्रवासी वेळेत घट, दळणवळणाचा कमी खर्च तसेच प्रदूषणात घट हे या वाहतुक पद्धतीचे फायदे आहेत. या अनुषंगाने मंत्रालयाने भारताच्या किनारपट्टीवर रो-रो आणि रो-पॅक्स फेरी सेवा कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर सर्व भागधारकांकडून अभिप्राय आणि सूचना मंत्रालयाने मागविल्या आहेत.