सातारा, विशाल गुजर : 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि भारतीय कुस्ती महासंघ या दोन गटांत डाव-प्रतिडाव सुरू आहे. यजमानपदाच्या लढतीत चुरस निर्माण झाली असून, शह-काटशहच्या राजकारणामुळे नक्की कुस्ती स्पर्धा कोठे होणार? आणि कोणती संघटना चितपट होऊन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचे मैदान कोण मारणार, याबाबत कुस्ती शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याच्या तयारीला वेग आला असतानाच न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनेदेखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनासाठी आखाड्यात उडी घेतली आहे. पुण्यात झालेल्या कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत अहमदनगरला स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. मुंबईत गुरुवारी (दि. 8) परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करून आ. संग्राम जगताप यांना स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र देण्यात आले होते.
कुस्तीगीर परिषदेने स्पर्धा आयोजनात आघाडी घेतली असताना कुस्ती संघटनेतील एका गटाने थेट दिल्लीच्या आखाड्यात उडी घेतली. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृ्रजभूषण सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर अस्थायी समितीच्या माध्यमातून पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचे खा. ब्रृजभूषण यांनी जाहीर करत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना आयोजनाचे पत्रदेखील दिले आहे. अस्थायी समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांत स्पर्धा आयोजनाबाबत कुस्ती सुरू आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा ही राज्यातील अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. दोन्ही गटांनी स्पर्धा आयोजनाबाबत आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. स्पर्धा आयोजनासाठी आखाड्यात नाट्यमय घडामोडी होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचे मैदान नेमका कोणता गट मारणार, याबाबत कुस्ती शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्पर्धा आयोजनाचा प्रश्न झाला प्रतिष्ठेचा
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला मोठा इतिहास आहे. मात्र, अलीकडच्या चार महिन्यांत राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर संघटनेतील गटा-तटाचे राजकारण उफाळून आले आहे. स्पर्धा आयोजनासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली असून, आयोजनाचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. मल्लांनी कोणत्या स्पर्धेत खेळायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. वर्चस्ववादाच्या लढाईत मल्लांचे नुकसान होऊ नये. दोन्ही गटांनी तुटेपर्यंत न ताणता कुस्ती क्षेत्राच्या भल्यासाठी मार्ग काढावा, अशी चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे.
स्पर्धेबाबत आज महत्त्वाची बैठक
अहमदनगरचे आ. संग्राम जगताप यांनी दीड महिन्यापूर्वी अहमदनगर येथे यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाबाबतचे पत्रक कुस्तीगीर परिषदेला दिले. त्यावर परिषदेच्या एका समितीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. आता पुणे येथे स्पर्धा संयोजनाचे पत्र महासंघाने दिले. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी परिषदेचे चीफ पेट्रन खा. शरद पवार यांच्या सूचनेनुसार बुधवारी (दि. 14) पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून, यात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.