मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकार 1 नोव्हेंबर रोजी राज्य स्थापना दिन धुमधडाक्यात साजरा करत असताना सीमाभागातील मराठी बांधवांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांनी सोमवारी काळा दिवस पाळला. काळा दिवस निमित्त काळ्या फिती लावून त्यांनी आपले कामकाज केले.
सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिवसेना आमदार भास्करराव जाधव, संजय शिरसाठ यांसह अनेकांनी काळी फित परिधान करून आपला निषेध नोंदवला. बेळगावसह मराठी भाषिक 865 गावे महाराष्ट्र राज्यात सामाविष्ट करण्यात यावी, या मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधव 66 वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र, या लढ्याकडे केंद्र आणि कर्नाटक सरकार दुर्लक्ष करीत आहे.
याच पार्श्वभूमीवर दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव आणि सीमाभागात सायकल फेरी आणि पदयात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि अहिंसेच्या मार्गाने काळा दिवस पाळण्यात येतो. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असताना कर्नाटक सरकारने राज्य स्थापना सोहळा साजरा केला, तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत सीमाभागातील मराठी बांधवांच्या बेळगाव येथील सायकल रॅली आणि पदयात्रेवर कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली.
या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्यातील मंत्री आणि आमदारांनी सोमवारी काळा दिवस पाळून निषेध व्यक्त केला. सीमाभागातील मराठी बांधवांचा हा लढा पक्ष,पंथ,धर्म व जातपातविरहित असल्याने राज्यातील लोकप्रतिनिधी आणि मराठी बांधवांनी सीमाभागातील या लढ्याला आपला पाठिंबा दिल्याबद्दल सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.