कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने भू-विकास बँकेची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा जिल्ह्यातील शेतकर्यांना 41 कोटींचा लाभ मिळणार आहे. कर्मचार्यांना 12 कोटी 41 लाखांचे थकीत वेतन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि कर्मचार्यांनाही दिलासा मिळाला, असे उद्गार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काढले.
राज्य शासनाने शेतकरी व बँक कर्मचार्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने कर्मचारी संघटनांनी क्षीरसागर यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील 940 सभासदांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे.
शाहूवाडी, करवीर, राधानगरी, कागल, हातकणंगले तालुक्यांतील सुमारे 1 हजार हेक्टर शेतजमिनीवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. 208 कर्मचार्यांना थकीत वेतन मिळणार आहे. ताराबाई पार्क व हातकणंगले येथील बँकेच्या जागा शासनाच्या ताब्यात येणार असून त्याठिकाणी इतर शासकीय कार्यालये सुरू होतील, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी विजयराव पाटील, नंदकुमार पाटील, भारत पाटील, श्रीकांत कदम, पद्माकर कापसे यांच्यासह भूविकास बँकेचे शेतकरी सभासद, कर्मचारी उपस्थित होते.