पुणे : पुढारी वृत्तसेवा
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमा वेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ), प्रमोद कोंढरे (रा. नातूबाग) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ) अशी अटकपूर्व जामीन झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे विभागाच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी तिघांनी अॅड. आशिष पाटणकर व अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला होता. युक्तिवादादरम्यान, अॅड. पाटणकर व अॅड. राजोपाध्ये म्हणाले, "तक्रारदार आणि अर्जदार हे प्रतिस्पर्धी पक्षाचे आहेत.
भाजपचा कार्यक्रम असल्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांना तिथे जाण्याचे काहीच कारण नव्हते. तक्रारदार आणि त्यांच्या सहकार्यांचा कार्यक्रमामध्ये अडथळा आणण्याचा हेतू होता. स्मृती इराणी यांच्या अंगावर शाई फेकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भारतीय दंडविधान संहितेमधील 354 कलम हे सार्वजनिक ठिकाणी लागू होत नाही. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे अर्जदारांना अटक होण्याची भीती आहे. न्यायालयाच्या अटी व नियमांचे पालन करण्यास आरोपी तयार आहेत. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा," असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.