बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे मुधोळ बाजारातून बेळगावला होणारा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे बाजारात बकरी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे महिनाभरात दोनवेळा मटणाच्या दरात वाढ झाली आहे. एक किलो मटणाचा दर 680 रुपयांच्या घरात पोहचला आहे.
बेळगावातील खाटिक मुधोळ येथील जनावराच्या बाजारावर अवलंबून आहेत. तेथून सुमारे 400 बकर्यांची आवक खाटिक समाज करतो. मात्र लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जनावरांचा बाजार शेतकर्यांनी बंद केला आहे. त्यामुळे बकर्यांची आवक थांबली आहे. त्याचा परिणाम मटण मार्केटवर झाला असून दर भडकला आहे. 580 ते 620 रुपये किलो मिळणारे मटण आता 680 रुपये किलोवर पोहोचले आहे. त्यामुळे स्थानिक धनगर समाजाने पाळलेल्या बकर्यांवर खाटिक बांधव अवलंबून आहेत. धनगर बांधवांनी बकर्यांचे दर वाढवल्याने मटणाच्या दरात वाढ करावी लागली असल्याची माहिती बेळगाव शहर हिंदू खाटिक समाज अध्यक्ष उदय घोडके यांनी दिली.