पुढारी ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज दुपारी सागर बंगल्यावर भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार तातडीने स्थापन होण्यासाठी फडणवीस सरकारचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सागर बंगल्यावर शिंदे हे फडणवीसांची भेट घेणार आहेत. शिंदे-फडणवीस राजभवनावर जाणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचे दुःख आम्हालाही आहे. ठाकरेंच्या विषयी आमच्या मनात कालही आदर होता आजही आहे, अशी भावना शिंदे यांनी गोव्यातील दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राज्यात गेली नऊ दिवस सत्तानाट्य सुरु होते. अखेर एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी, गुरुवारीच अधिवेशन बोलवा आणि बहुमत सिद्ध करा, असे आदेश राज्यपालांनी उद्धव यांना दिले होते. बंडखोरांच्या अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट असताना शक्तिपरीक्षा कशी? असा सवाल करीत शिवसेनेने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र, न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळताच रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा जाहीर केला आणि राजभवन गाठले. शिवसेनेतील बंडाळीचे ओझे असह्य होऊन ठाकरे सरकार कोसळल्याने महाराष्ट्रात सत्तांतर होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.