मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पैसे घेऊन पोलीस बदल्या केल्या जात असल्याचा आरोप आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास सुरू केला आहे.
सीबीआयने याप्रकरणी महादेव इंगळे याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावी जाऊन चौकशी केली. सीबीआयच्या या कारवाईमुळे शुक्ला यांच्या अहवालातील 18 पोलीस अधिकारी रडारवर असल्याची माहिती मिळते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी असलेल्या इंगळे याच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. रश्मी शुक्ला यांच्या अहवालातील पोलीस बदल्यांच्या रॅकेटमधील चार दलालांपैकी इंगळे हा एक प्रमुख दलाल आहे.
तो अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांशी जवळीक साधून होता. पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांसाठी इंगळे हा अॅडव्हान्स म्हणून 50 हजार रुपये आणि पुढे 35 ते 40 लाख रुपये घेत होता.
रश्मी शुक्ला यांनी 20 ऑगस्ट 2020 ला अहवाल तयार केला आणि 25 ऑगस्टला तो तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांना सादर केला. पुढे 26 ऑगस्टला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आला. यात 6 आयपीएस अधिकार्यांसह एकूण 29 अधिकार्यांची नावे शुक्ला यांनी दिली होती.
महादेव इंगळे याने यातील 18 अधिकार्यांच्या बदल्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात सीबीआय या अधिकार्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
महादेव इंगळे याचे दोन फोन नंबर रश्मी शुक्ला यांचा विभाग 29 जुलैपासून तपासत होता. त्यातील संभाषणामध्ये गृहमंत्री आणि दादा या दोन नावांचा उल्लेख करण्यात आला होता.
इंगळे हा आपल्या राजकीय आणि अन्य ओळखी वापरून पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करत होता. त्यासाठी तो मोठी रक्कम वसूल करत असल्याचे उघड झाले आहे. सीबीआय चौकशीमुळे राजकारण्यांसोबत प्रशासकीय व्यक्तींच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची दाट शक्यता आहे.