पुणे : आखिल मंडई शारदा गणेश मंडळाने मुस्लिम समाजाच्या हस्ते आरती करून शिरखुर्माचा प्रसाद ठेवला होता. हा एक समाजाला आदर्श निर्माण करणारा आहे, त्यामुळेच पुण्यातील गणेशोत्सव हा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी आज पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेट दिली. त्यावेळी अखिल मंडई मंडळाने त्यांचा विशेष सन्मान केला त्यावेळी आठवले बोलत होते.
पुढे ते म्हणाले की , स्वांतत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करून सर्व धर्म ,जात व समाजाला एकत्र करण्याचा हा अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. पूर असेल, कोरोना सारख्या अनेक अडचणीच्या काळात पुण्यातील गणेश मंडळे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जातात हा सर्व समाजासाठी व देशासाठी आदर्श मानल पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी आखिल मंडई शारदा गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आठवले यांचा विशेष सन्मान करण्यात आला . रामदासजी आठवले यांनी यांनतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ तसेच शहरातील विविध श्री गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ.सीमा आठवले ही उपस्थित होत्या .
यावेळी रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी यांनी आखिल मंडई शारदा गणेश मंडळांच कार्य व इतिहास सांगितला.
रिपब्लीकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, प्रदेश सचिव परशुराम वाडेकर , असित गांगुर्डे तसेच अखिल मंडई मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व पुणे शहरातील रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .