मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांत विनय रामनारायण सिंग ऊर्फ बबलू या हॉटेल व्यावसायिकाला गुरुवारी गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून विनय सिंग हा चवथा आरोपी आहे.
गोरेगाव येथे राहणार्या विमल अग्रवाल या व्यावसायिकाने परमबीरसिंग यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध काही महिन्यांपूर्वी गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी परमबीर सिंग, अल्पेश भगवानभाई पटेल, विनय सिंग, सचिन वाझे, रियाज भाटी, सुमीत सिंग ऊर्फ पिंटू यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवला होता.
गुन्हा दाखल होताच सुमीत, अल्पेश आणि सचिन वाझे या तिघांना कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली होती. याच गुन्ह्यात नंतर परमबीर सिंग यांचीही पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदवण्यात आली होती.
या जबानीनंतर परमबीरसिंग यांच्यासह इतर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. त्यात परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून सचिन वाझे हा शहरातील बारमालक, हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी वसुलीचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सचिन वाझेने काही बुकींना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले होते. तसेच तक्रारदार व्यावसायिकाकडून सचिन वाझेने परमबीर सिंग यांच्यासाठी बारा लाख रुपयांची खंडणी घेतली होती. त्यात तीन लाख रुपयांच्या दोन महागड्या आयफोनचा समावेश होता.
याच गुन्ह्यात विनय सिंग, रियाज भाटी या दोघांना पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले होते. या दोघांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी विनय सिंग याला पोलिसांनी अटक केली.
* विनय हा हॉटेल व्यावसायिक असून त्याचे तक्रारदारासोबत भागीदारीत गोरेगाव येथे एक हॉटेल सुरू आहे. त्याचा या खंडणीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यात त्याला शुक्रवारी किल्ला न्यायालयात हजर करून त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. विनय सिंगच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.