Latest

धुळे : समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कारस्थानच – माजी आमदार अनिल गोटे

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शेतकरी, दलित, आदिवासी, धनगर यांनी भाजपाला दिलेले प्रत्येक मत स्वतःच्याच विरोधात नोंदवले जाईल तसेच समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान असल्याचा खळबळ जनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही वीट न ठेवता कोट्यवधी रुपये खर्ची पडले कसे, असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांची वाताहात लावली आहे. २०१४ मध्ये असलेल्या शेतमालाच्या भावाशिवाय सर्व वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. केवळ शेतमालाचे भाव २०१४ मध्ये होते. त्यापेक्षा कमीच झाले आहेत. खते, औषधे, बियाणे, औजारे यांच्या दरात दुपटी-तिपटेने दरवाढ झाली आहे. शेतमाल बाजारात येताच शेतीमालाचे भाव मात्र तासा-तासाने कमी का होतात?, याचा शेतकऱ्यांनी विचार करावा, असे आवाहन गोटे यांनी केले आहे. अन्नदात्याला शत्रु, अतिरेकी व देशद्रो‌ह्यांपेक्षा वाईट वागणूक दिली जाते. याचा गांभियनि विचार करण्याची हीच वेळ आहे. असा टोला गोटे यांनी लगावला आहे. कांदा, सोयाबीन, कापूस इत्यादी शेती उत्पादनाचे भाव ठरवून पाडले जातात. शेतकरी जीवनप्रवास संपवीत आहेत, त्याचे या सरकारला काही घेणे-देणे नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी भाजपाला मत देवू नये. भाजपाच्या प्रचारकांना व वाहनांना गावा बाहेर हाकलून लावणे, हे देशभरात सर्वत्र सुरू आहे. गावोगाव शपथ घेवून भाजपाला अजिबात मतदान करू नये. असा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत देखील गोटे यांनी व्यक्त केले आहे.

शिव स्मारक रखडवण्याच्या राजकारणावर टिका
भारतीय जनता पक्ष उच्चवर्णीय व उच्चवर्गीय लोकांचा आहे. भारतीय जनता पक्ष मराठा द्वेष्टा आहे. केंद्रात दहा वर्षे व राज्यात साडेसात वर्ष सत्ता असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या एका विटेचे बांधकाम सुध्दा झाले नाही. तरी, १६ कोटी २८ लाख रूपये महाराजांच्या स्मारकाच्या खर्चापोटी कसे खर्ची पडले?, छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीत तब्बल तीन दिवस ताटकळत ठेवले. सिनेतारका कंगणा रणावत व नवनीत राणा यांना मात्र पाचच मिनिटात भेट दिली. छत्रपतींच्या वंशजाचा म्हणण्यापेक्षा मराठ्यांचा अजून किती अपमान होणे बाकी आहे? ही भाजपाची मस्ती उतरविण्याची संधी मराठ्यांना चालून आली आहे. दवडू नका, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले.

मणिपूरच्या घटनेवरून टीकास्त्र
मणीपूर मध्ये आदिवासी महिलेवरील अत्याचाराला न्याय देण्यासाठी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा गेल्या चौदा महिन्यात मणिपूर मधे फिरकले सुध्दा नाहीत. प्रारंभीचे दोन महिने ही बातमी प्रसिध्दी माध्यमांपासून लपवून ठेवण्यात आली. आदिवासींवर गोळ्या झाडणारा भाजपाचा मुख्यमंत्री आजही आपल्या पदावर बसून आहे. याचा या निवडणुकीत आदिवासी बांधव निश्चित विचार करतील. असा विश्वास देखील गोटे यांनी व्यक्त केला आहे.

धनगर आरक्षणावरुन फसवणूक
धनगर समाजाला गेल्या दहा वर्षापासून झुलवत ठेवले आहे. लोकसभेच्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात स्वतः नरेंद्र मोदींनी बारामती व सोलापूर प्रचार सभेत धनगर आरक्षणाचे वचन दिले होते. त्यामागे केवळ धनगर समाजास मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे समजून मूर्ख बनविण्याचे डावपेच होते. याचे धनगर समाजाने कधीही विस्मरण होवू देवू नये. याची जाणीव तेवत ठेवावी असे आवाहन अनिल गोटे यांनी केले आहे.

फुट पाडण्याचे राजकारण हाणून पाडा
अल्पसंख्याक मुस्लीम आपणांस मत देत नाही. देणार नाहीत. याची पूर्ण कल्पना असल्याने 'फुट पाडा व राज्य करा' ही गोऱ्या इंग्रजांची निती भाजपाचे नेते राबवीत आहेत. याचा अल्पसंख्याक नेत्यांनी शांतपणे विचार करावा. अल्पसंख्याक उमेदवार आपल्या समाजाच्या स्वतःच्या मतांवर निवडून येवू शकत नाही. याची आपणांस पुरेपुर जाणीव आहे. अल्पसंख्याक समाजाने गांभिर्याने विचार करून या निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी भाजपाच्या भात्यातील एक बाण काढून घेण्यासाठी भाजपाच्या कारस्थानास बळी पडू नका. कुठल्याही सर्वसामान्य उमेदवारास विजयी करा , विद्वेषाच्या धर्मा-धर्मात भांडण लावणाऱ्या राजकारणाचा अंत करण्याची आलेली संधी दवडू नये,असे आवानही माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे व लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांनी केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT