पाटणा; वृत्तसंस्था : बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले असून ते कोणत्याही क्षणी तुरुंगात जाऊ शकतात, असे वक्तव्य भाजपचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री खा. सुशीलकुमार मोदी यांनी केले.
नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून राजदसोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीशकुमार यांच्या आरोपांबाबत त्यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली. ते म्हणाले की, संयुक्त जनता दलाचे आरसीपी सिंह यांना नितीशकुमार यांच्या संमतीनेच केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले होते. त्यामुळे नितीशकुमार यांना याबाबत कल्पना नव्हती हा त्यांचा आरोप खोटा आहे. आम्हीच नितीशकुमार याना पाच वेळा मुख्यमंत्री केले. 2020 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच मते मिळाली.
शिवसेना आमचा सहयोगी पक्ष नाही : मोदी
सुशीलकुमार मोदी म्हणाले, भाजपने कधीही संयुक्त जनता दलात फूट पाडण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही कुठल्याही पक्षात फूट पाडलेली नाही. शिवसेनेबाबत बोलायचे तर शिवसेना आमचा सहयोगी पक्ष नाही. शिवसेना इतर पक्षांसह सत्तेत होती. लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना 'पलटूराम' म्हटले होते. नितीशकुमार 'राजद'लाही धोका देऊ शकतात.