मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ईडीने टाच आणलेला सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना 27 हजार शेतकरी सदस्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमडळाने गुरुवारी केली. हा कारखाना मूळ सभासद शेतकर्यांना देण्याची तयारी ईडीने दाखवल्याचा दावा सोमय्या यांनी केला असून, हे शेतकरी पीएमएलए कोर्टात तशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालयात जाऊन अधिकार्यांना शेतकर्यांची भूमिका सांगितली. हा कारखाना 27 हजार सभासद शेतकर्यांनी उभा केला आहे. फसवणूक आणि घोटाळा करून ताबा मिळवलेला कारखाना पुन्हा मूळ शेतकर्यांना परत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवार आणि कुटुंबीयांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीने पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर छापे टाकले होते. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 मध्ये विक्री करण्यात आली होती. त्यावेळी तो मूळ किमतीपेक्षा कमी किमतीला विकत घेण्यात आला होता.
अजित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना हा कारखाना मेसर्स गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकण्यात आला. नंतर लगेच हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्त्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मोठा हिस्सा आहे. ही कंपनी अजित व सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे, असा आरोपही करण्यात आला होता.
ईडीने हा कारखाना पुन्हा शेतकर्यांना परत करण्याची तयारी दाखवली आहे. त्यासठी शेतकर्यांनी तशी मागणी पीएमएलए कोर्टाला करावी, असे ईडीने सुचवले आहे.
सोमय्यांचे आरोप
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात 1200 कोटींंचा घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये मोठा हिस्सा असलेल्या स्पार्कलिंग सॉईल कंपनीत अजित व सुनेत्रा पवार यांच्या मालकीची असल्याचाही आरोप आहे.