Latest

चैतन्यदायी दीपोत्सव; आज मुख्य दिवस

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बळीराजाच्या भारतीय कृषी संस्कृतीचा आविष्कार म्हणजे दीपोत्सव. सोमवारी वसुबारस- गोवत्सपूजनाने या दीपोत्सव ला सुरुवात झाली. मंगळवारी धनत्रयोदशीही उत्साहात साजरी करण्यात आली. दीपावलीच्या प्रकाशपर्वाचा चैतन्यदायी प्रारंभ दोन दिवसांपूर्वीच झाला असला, तरी मुख्य दिवस गुरुवारी (दि. 4) आनंदात साजरा होत आहे.

नरकचतुर्दशीला मंगलस्नान आणि सायंकाळी श्री लक्ष्मी-कुबेरपूजन होणार आहे. याची जय्यत तयारी घरोघरी करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदा कोरोनाची भीती नसल्याने लोकांमध्ये दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे.

दिवाळी सणातील महत्त्वाची नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेरपूजनाचा योग गतवर्षीप्रमाणेच यंदाही एकत्र आला आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे, तेव्हाच आत्म्यावरील अहंमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, अशी यामागची भावना आहे.

अभ्यंगस्नान झाल्यावर देव व आई-वडिलांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वत्र समृद्धी व्हावी, याकरिता पणत्या लावल्या जातात. यानंतर देवाला फराळ व गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा होतो. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवून त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. लक्ष्मीरूपाने तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, ही यामागची संकल्पना आहे.

SCROLL FOR NEXT