छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या रब्बी हंगामात एकूण क्षेत्राच्या तब्बल १३३ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे. गव्हासाठी अत्यावश्यक असणारी थंडी यंदा फार काळ काही पडली नाही, त्यातच उष्णता वाढू लागल्याने, गव्हाला फटका बसण्याची शक्यता आहे, परिणामी यंदा गव्हाच्या उत्पादनात ४० टक्क्यापर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत गव्हाचे १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर क्षेत्र आहे, तर शेतकऱ्यांनी २ लाख ९ हजार ४५ हेक्टरवर गव्हाचे पीक घेतले आहे. सध्या खुल्या बाजारात गव्हाचे दर तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. त्यामुळे यंदा गव्हाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र यंदा नेहमीप्रमाणे थंडी काही पडलेली नाही. त्यातच मार्चमध्ये तापमानात होणारी वाढ फेब्रुवारीपासूनच जाणवू लागली आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीपिकांना बसत आहे. उष्णतेत वाढ झाल्याने, यंदा गव्हाला फटका बसेल, गव्हाच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के घटेल. आधीच कापूस, सोयाबीनला भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे. कांद्यांचे वांदे झालेले आहे. त्यात आता गव्हालाही वातावरणाचा फटका बसत असल्याचे अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले..