रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरला सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच स्थापन करण्याचा लढा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच स्थापन करण्याचे निवेदन खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले. त्यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री बोलत होते.
तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी 19 जुलै रोजी खंडपीठ कृती समितीला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांची व आपली या विषयी भेट झाल्यानंतर सर्किट बेंचबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. उद्योगमंत्री उदय सामंत व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने ही चर्चा झाली.
खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, बार कौन्सिल सदस्य अॅड. संग्राम देसाई यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींच्या पत्रानुसार आपण सर्किट बेंचप्रश्नी मुख्य न्यायमूर्ती यांची?भेट घेणे आवश्यक आहे. बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे यांनी 37 वर्षांच्या लढ्याची सांगता आपल्या कारकिर्दीत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस व पंढरपूरचे बार असो. अध्यक्ष अॅड. भगवान मुळे यांनी शिंदे यांचा सत्कार केला. अॅड. विजयकुमार ताटे देशमुख (सचिव, खंडपीठ कृती समिती), अॅड. शिवाजीराव मर्ढेकर (अध्यक्ष, सातारा बार असो.), अॅड. प्रशांत चिटणीस, अॅड नारायण भांदिगरे, अॅड. प्रदीप जाधव (अध्यक्ष, सांगली बार असो.), अॅड. भाऊसाहेब पोवार (माजी अध्यक्ष, सांगली बार असो.) अॅड. दिलीप धारिया (अध्यक्ष, रत्नागिरी बार असो.), अॅड. मधुकर नाईकनवरे, अॅड. राहुल बोडके, अॅड. प्रताप हारुगडे (सांगली), अॅड. सचिन पाटील, अॅड. सुभाष संकपाळ उपस्थित होते.