महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील वाठार आणि वाळवा तालुक्यातील येलूर या दरम्यानही उंच उड्डाणपूल होण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय या दरम्यानचा महामार्ग कायमस्वरूपी वाहतुकीसाठी सुरक्षित होणार नाही.
मुंबई-बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना वाठार ते येलूर या दरम्यान वाठार आणि तांदूळवाडी या दोनच ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. उर्वरित मार्गावर जवळपास दहा ते पंधरा फुटांचा भराव टाकून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील कणेगाव या ठिकाणी वारणा नदी या महामार्गाला आडवी जाते.
या ठिकाणी एक जुना आणि एक नवीन असे दोन पूल आहेत. मात्र नदीपात्राच्या उत्तरेला येलूरपर्यंत आणि दक्षिणेला वाठारपर्यंत मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. वारणा नदीला पूर किंवा महापूर आल्यानंतर पूर्वी ते पाणी रस्त्यावरून पलीकडे जात होते. मात्र महामार्गाच्या भरावामुळे आता वारणेच्या पाण्याला पुढे वाहून जाण्यासाठी केवळ पुलाखालूनच वाट आहे. वारणेला मोठ्या प्रमाणात महापूर आल्यानंतर मात्र ते प्रचंड पाणी केवळ पुलाखालून पलीकडे वाहून जाऊ शकत नाही.
परिणामी हे पाणी उत्तरेला तांदूळवाडी-येलूरपर्यंत आणि दक्षिणेला किणी-घुणकी-वाठारपर्यंतच्या शिवारात फैलावते. पाणी वाढत जाईल तसतसे ते महामार्गावर येऊ लागते आणि आठ-आठ दिवस वाठारपासून ते येलूरपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी बाधित होतोच; शिवायमहामार्गाच्या दोन्ही बाजूकडीलहजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 2005, 2019 आणि नुकत्याच आलेल्या महापुरात याचा चांगलाच प्रत्यय आला आहे.
मुंबई-बंगळूर महामार्गाचे महत्त्व राज्याच्या आणि कोल्हापूर -सांगली जिल्ह्याच्या द़ृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे. त्यामुळे हा महामार्ग आठ आठ दिवस बंद पडणे अनेक अर्थांनी परवडण्यासारखे नाही. त्यामुळे महापुरातही हा महामार्ग निर्धोक राहण्यासाठी वाठार ते येलूर दरम्यान सध्या असलेल्या रस्त्याच्या उंचीपेक्षा किमान आठ-दहा फूट उंचीचा उड्डाणपूल होण्याची आवश्यकता आहे.
शिवाय या महामार्गावर टाकण्यात आलेला भरावही हटविण्याची आवश्यकता आहे.
सध्या कणेगाव येथे असलेला जुना आणि नवा हे दोन्ही पूल महापुराने बाधित होऊन वाहतुकीला निरुपयोगी ठरतात.
याचाच अर्थ या ठिकाणी झालेले महामार्गाचे आणि पुलाचे बांधकामही महापुराच्या निकषानुसार झालेले नाही.
त्यामुळे या बांधकामातील चुका आता दुरुस्त करण्याची गरज आहे.
सातारा-कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम करीत असताना या चुका दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
त्यावेळी इथल्या रस्त्यावरील सगळा भराव हटवून वाठार ते येलूर या जवळपास दहा किलोमीटर मार्गावर उंच उड्डाणपूल होण्याची आवश्यकता आहे.
या भागातील हजारो एकर शेतीच्या भल्यासाठीही इथून उड्डाणपूल होण्याची गरज आहे.
महापुरात या भागातील सगळी शेती जवळपास महिना-महिनाभर पाण्यात उभी असते.
गेल्या आठ-दहा वर्षांत याच कारणाने या भागातील शेती मोठ्या प्रमाणात क्षारपड झालेली आहे.
उर्वरित शेतीलाही भविष्यात तसाच धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या भागातील शेतीसाठीही इथून उड्डाणपूल होण्याची आवश्यकता आहे.