कोल्हापूर : सुनील सकटे : नाट्यपूर्ण घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राज्यात एक महिन्यात मंजूर झालेल्या विकासकामांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे राज्यातील विविध कामांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यालाही बसणार आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेवर आले आहे. शपथविधी होताच नव्या सरकारच्या कारभार्यांनी महाविकास आघाडी सरकारने गेल्या महिनाभरात विविध विकासकामांवर मंजूर केलेल्या निधींचा आढावा घेतला.
यामध्ये राज्यात सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास विभागासह विविध विभागांतर्फे राबविण्यात येणार्या योजनांच्या मंजुरीची माहिती घेतली आहे. गेल्या महिनाभरात 15 वा वित्त आयोग, लमाण तांडा, योजना, 25/15, एसआर आदींसह विविध हेडखाली मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा आढावा घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे.
या हेडसह अन्य विविध हेडखाली मंजूर झालेल्या योजनांचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे. या योजना रद्द करून नव्याने आखणी करण्याचे नव्या सरकारचे संकेत आहेत. त्यामुळे एक महिन्यात मंजूर झालेल्या आणि उपलब्ध निधीतून जास्तीत जास्त कामांच्या वर्कऑर्डर कशा पूर्ण करता येतील, यामध्ये मावळत्या सरकारमधील कारभारी व्यस्त आहेत.
जास्तीत जास्त वर्कऑर्डर कशा काढता येतील याचा अंदाज घेत कामाचा उरक सुरू होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणि परिसरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ठेकेदार कार्यकर्ते आणि अधिकारी कर्मचार्यांची वर्दळ सरू होती. या एक महिन्यातील मंजूर निधीचा विकासकामांनुसार आढावा घेऊन त्या स्थगित करण्यात येणार आहे. या योजनांची फेररचना करून पुन्हा नव्याने त्या मंजूर करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येते.