Latest

कोल्हापूर : पुनर्वसनमंत्र्यांनी ओढली जुन्याच उपाययोजनांची री!

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आपत्तीत बाधित होणार्‍या नागरिकांना तत्काळ मदत व त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी केली जाईल, त्याचे जिल्ह्यातील यंत्रणांना प्रशिक्षण द्या, जिल्ह्यातील पुराचा वाढता धोका विचारात घेता 'एनडीआरएफ' आणि 'एसडीआरएफ'ची पथके कायमस्वरूपी तैनात करा, अशा यापूर्वी अनेकदा दिलेल्या आदेशांची री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी ओढली.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे व सोलापूर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांचा मान्सूनपूर्व तयारीचा सोमवारी विजय वडेट्टीवार यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत महापूर नियंत्रणासाठी नवीन उपाययोजनांची अपेक्षा राज्य शासनाकडून होती. मात्र, वडेट्टीवार यांनी जुन्याच उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने कोल्हापूर आणि सांगलीवासीयांची घोर निराशा झाली आहे.
सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर, यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तींमध्ये बाधित होणार्‍या नागरिकांना तत्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले.

या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलशे बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदींसह अन्य जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT